पुणे : ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापराने आज अनेक उपकरणे विकसित होत आहेत. आरोग्याची काळजी घेणारी ही उपकरणे भविष्यात माणसाचे आयुर्मान वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अवघड आणि अशक्य कामे रोबोटकडून होऊ लागले आहेत. त्यामुळे माणसाला यापुढे कष्टाची नाही, तर बुद्धीची कामे करण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे,’ असे मत ‘एमकेसीएल’च्या ई-प्रशासन विभागाचे सरव्यवस्थापक सचिन सातपुते यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग (मविप), मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर सचिन सातपुते ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्राच्या सभागृहात नुकत्याच रंगलेल्या या कट्ट्यावर निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. विद्याधर बोरकर, ‘मविप’चे संजय मालती कमलाकर यांच्यासह विज्ञानप्रेमी सहभागी झाले होते.
सातपुते म्हणाले, ‘तंत्रज्ञानाचा वापर करून सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी वापरली जाणारी बुद्धिमत्ता ही कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. आज मोबाईल, इंटरनेट, गुगल, अनुवाद, नकाशे, रोबोट आणि अशा अनेक गोष्टीत ही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते. आपण वापरत असलेल्या प्रत्येक उपकरणाद्वारे आणि अॅप्लिकेशनद्वारे आपली माहिती साठवली जाते. त्याआधारे ही बुद्धिमत्ता काम करते. शेती कामासाठी, औद्योगिक क्षेत्रासाठी, शिक्षण आणि आरोग्यासह इतर अनेक क्षेत्रासाठी आवश्यक उपकरणे या बुद्धिमत्तेच्या जोरावर निर्मिली जात आहेत.’
‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत असल्याने मानवाच्या रोजगारावर परिणाम होईल, अशी भीती अनेकांना वाटते; परंतु यामुळे काही नोकऱ्या कमी होतील, तर दुसरीकडे यातून रोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण होऊ शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेचा कितीही वापर वाढला, तरी मानवाच्या बुद्धिमत्तेचे महत्त्व कायम राहणार आहे. गरिबी हटवण्यासाठी, सर्वांच्या शिक्षणासाठी, चांगल्या आरोग्यासाठी या कृत्रिम बुद्धिमत्तेचा चांगला वापर करून घेणे आपल्यावर आहे. तसे झाल्यास भविष्यात मानवाच्या जगण्याचा कालावधी निश्चित वाढणार आहे,’ असेही सातपुते यांनी नमूद केले.